

नागपूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जर पुन्हा भाजपमध्ये आले, तर आपल्याला नक्कीच आनंद होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि.१३) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. एकनाथ खडसे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी काय चर्चा झाली, याबाबत आपल्याला सविस्तर माहिती नाही. मात्र, भाजप वाढवण्यात ज्या नेत्यांनी जीवाचे रान केले, त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव आघाडीवर आहे, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मी जेव्हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा खडसे हे विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी केलेले कार्य मोठे आहे. मात्र, त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच घेईल. दरम्यान, सोशल मीडियावरील मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर बोलताना त्यांनी टोला लगावला की, मुख्यमंत्री व्हावे असे सर्वांनाच वाटते. भाजपमध्ये सर्वाधिक काळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद भूषविले आहे. सध्या सोशल मीडियावर समर्थकांनी आपापल्या नेत्यांचे असे २५ मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार केले आहेत, त्याला काही अर्थ नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' आंदोलनावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिराचे आजीवन सदस्य आहेत आणि तिथे दुसऱ्या कोणाला जाता येणार नाही, हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. 'आजीवन कुणीही नसते, जीवन तो रामका है' अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला. उद्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही प्रभू श्रीरामाचे नाव घेतले पाहिजे, असा खोचक चिमटा मुनगंटीवार यांनी यावेळी काढला.