

नागपूर: राज्यात अतिवृष्टीने झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पूर पीडित शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याची मागणी करत, मदत न मिळाल्यास 'एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही' असा कडक इशारा सपकाळ यांनी दिला आहे.
परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्या दिल्ली भेटीवर टीका केली. "मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले," असे ते म्हणाले. या भेटीत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांपेक्षा सुरजागडच्या खाणींमध्ये जास्त रस होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मे महिन्यापासून पाऊस धुमाकूळ घालत असतानाही राज्य सरकारने अद्याप केंद्राला कोणताही अहवाल पाठवलेला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणार नाही, तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉटला तिलांजली देऊन गांधी विचार व भारताचे संविधान स्विकारावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रपरिषदेत केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देश एकवटला होता. राजकीय व्यवस्था परिवर्तनाबरोबच सामाजिक परिवर्तन ही काँग्रेसची भूमिका होती तर मुठभर लोकांच्या हातात सत्ता असावी ही संघाची भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणारा, स्त्री-पुरुष समानता न माननारा, स्पृश्य-अस्पृशता माननारा संघाचा विचार आहे. तर परिवर्तनाचा व माणुसकीचा विचार काँग्रेसकडे आहे.
रा. स्व. संघाला इंग्रजांची व्यवस्था मान्य होती, म्हणून ते स्वातंत्र्य लढाईत सहभागी झाले नाहीत. सर्वांना मताचा अधिकार हेही त्यांना मान्य नव्हते. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना देश हा सर्वांचा आहे हे मान्य करून विषारी व विखारी विचार सोडावा व राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो लावून त्या मार्गाने मार्गक्रमण करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महान क्रांतीकारक शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्ताने नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने मशाल मोर्चा काढला व संविधान चौकात सभा झाली. उद्या सोमवार दि २९ सप्टेंबर रोजी दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रम पर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा निघत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत.