

India Pakistan Tension
नागपूर- नागरिकांनी नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे राष्ट्रविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नये यासाठी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.आपली देशभक्ती दाखवा आणि आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार राहावे, राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या माध्यमातून केले आहे.
संघाने यासंदर्भात शुक्रवारी एक निवेदन जारी केले. यात पहलगाम येथील भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेवर "ऑपरेशन सिंदूर" ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन केले.
हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे.आमचा असाही विश्वास आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या रचना आणि समर्थक यंत्रणेवर करण्यात येणारी लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे.
राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश शरीर, मन आणि धनाने सरकार आणि देशाच्या सशस्त्र दलांसोबत उभा आहे.
भारताच्या सीमेवरील धार्मिक स्थळांवर आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो असेही नमूद केले आहे. या आव्हानात्मक प्रसंगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना सरकार आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन करतो.