Operation Sindoor | 'ऑपरेशन सिंदूर'चे मोठे यश! कंदाहार विमान अपहरणाच्या मास्टरमाईंडचा खात्मा
भारताने पाकिस्तान दहशतवादविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पहलगाम हल्ल्याचा सूड घेतला. भारताने राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये जवळपास १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमधील मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानी दहशतवादी 'अब्दुल रौफ अजहर' हा देखील ठार झाल्याचे समोर आले आहे.
भारतातील 'या' दहशतवादी हल्ल्यात होता सहभाग
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला रौफ अजहर हा भारतातील कंदहार विमान (IC-814) अपहरण, पठाणकोट दहशतवादी हल्ला आणि भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानी दहशतवादी होता. पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रौफ अजहर भारतातील कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंट देखील होता, असे भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे भारतातील 'IC-814 कंदहार हायजॅक' प्रकरण
भारताचे पाकिस्तान विरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' अद्याप संपलेलं नाही, हे भारत सरकारने स्पष्ट केलंय. अब्दुल रौफ अजहर हा IC-814 कंदहार हायजॅकचा मास्टरमाइंड होता. १९९९ साली इंडियन एअर (Indian Air) लाइन्सच्या या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. या विमानातील प्रवाशांच्या मोबदल्यात मसूद अजहरला भारत सरकारला जिवंत सोडावं लागलं होतं. पुढे जाऊन त्याने 2001 साली भारतीय संसदेवर हल्ला केला. त्यानंतर 2019 साली पुलवामा घडवून आणलं, ज्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.
कोण होता अब्दुल रौफ अझहर
दहशतवादी अब्दुल रौफ अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा उपकमांडर आणि ऑपरेशनल हेड होता. मसूद अजहर हा त्याचा भाऊ आहे, जो भारताविरुद्ध अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी आहे. रौफ हा १९९९ मध्ये झालेल्या भारताच्या आयसी-८१४ विमान अपहरणाचा मास्टरमाइंड होता. याला कंधार अपहरण असेही म्हणतात. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यातही रौफ अजहर दोषी मानला जातो.


