नागपूर, पुढारी वृत्तसेवा: भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरातमध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्थानपर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा, धर्माचा प्रसार व प्रचार केला. त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह धरला. खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामींनी केली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.७) केले.
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्ष निमित्त सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात ते बोलत होते. या वेळी विध्वंस बाबा, परम पुज्यनीय कारंजेकर बाबा, कापूसतळणीकर बाबा, बिडकर बाबा, मु.धो.व्यास बाबा, आमदार परिणय फुके, आ कृपाल तुमाने, इतर संत-महंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या अनुषंगाने रिध्दपूरला एक विशेष महत्व आहे. मराठीतील पहिला ग्रंथ रिध्दपूरला साकारला व तो महानुभाव पंथाने निर्माण केला अशी धारणा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह धरतांना आपल्याकडे मराठीतील हे ग्रंथच महत्वाचे प्रमाण असल्याचे स्पष्ट केले. 230 कोटी रुपयांचा विकास आराखडा रिध्दपूरसाठी मी मुख्यमंत्री असताना तयार केला. आज मराठीचे पहिले विद्यापीठ हे रिध्दपूरला स्थापन झाले आहे. त्याच्या कुलगूरुपदी महानुभाव पंथाच्या अभ्यासकाला नियुक्त करता आल्याचा आनंद वेगळा असल्याचे सांगितले.
अर्थसंकल्पानुसार दुसऱ्या टप्यातील 25 कोटीचा निधी देण्याचा निर्णय केला आहे. श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे निधी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याचबरोबर इतर देवस्थानांना निधीची उपलब्धता आपण केली आहे. जवळपास 78 कोटी रुपयांचा हा निधी आहे. काटोल येथे कामाबाबत जो प्रस्ताव आलेला आहे. त्याबाबत 25 कोटीचा आराखडा आपण तयार करुन टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन देऊ असेही उपमुख्यमत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महानुभाव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. रिध्दपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अविनाश अवलगावकर व इतर महंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.