

Prevention of child marriage in Maharashtra.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मालापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात १५ वर्षांची नवरी आणि ३५ वर्षांचा नवरदेव असा विवाहाचा घाट उधळून लावला गेला. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा बालविवाह केला जात असल्याची माहिती मिळताच बालसंरक्षण विभाग प्रशासनाने तातडीने कारवाईसाठी पाऊल उचलले.
पोलिसांच्या मदतीने या मुलीची सुटका करण्यात आली. आता या विवाहात सहभागी असणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. नरखेड पोलिसांनी या विवाहात दोषी असलेल्यांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या कारवाईमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलिस निरीक्षक मंगला जिल्हा बालरक्षक मोकाशी, समन्वयक प्रसेनजित गायकवाड तसेच चाइल्ड लाइन प्रतिनिधी मीनाक्षी घडाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुटका केलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिला पुढील काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. तिच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय बालकल्याण समिती घेणार आहे. अशा प्रकारच्या बालविवाहाच्या घटना आढळल्यास तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे हक्क व संरक्षण सुनिश्चित करता येतील असे आवाहन प्रशासनाने केले आहे.