

West Bengal election results
नागपूर : पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झाल्यामुळे सत्तांतर होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी सत्ता गमावणार असून भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. २४) केला.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात साडेचार लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन देवस्थानांच्या नावाने आहे. देवस्थानांच्या आणि वहिवाटदारांच्या बाबतीत काय अधिकार आहेत, यासंदर्भात स्पष्टता आवश्यक आहे.
देवस्थानांच्या जमिनी संदर्भातील वाद संपवण्याची आवश्यकता आहे. देवस्थानांचे हक्क, कुळांचे हक्क आणि वहिवाटदारांचे अधिकार याबाबत कायदेशीर स्पष्टता करण्यासाठी सरकार कायदा करण्याचा विचार करत आहे. हा मसुदा पुढील दोन-तीन दिवसांत महसूल खात्याच्या वेबसाइटवर सार्वजनिक डोमेनमध्ये टाकण्यात येईल, जेणेकरून इच्छुकांना आपली मते आणि सूचना देता येतील. यावर जुलै महिन्यात चर्चा केली जाणार आहे.
उष्माघाताच्या संदर्भात, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून मी बैठक घेतली. दोन्ही जिल्ह्यांतील जलसाठे अधिक मजबूत करणे, उपलब्ध पाणी साठवून ठेवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जिथे शक्य आहे तिथे पाणी कपात करणे, अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणी वाहून जाण्यापेक्षा ते अडवणे आणि जिरवणे यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत. यावर्षी पाण्याची काटकसर सर्वांनी करणे आवश्यक आहे.
मराठवाड्यातील परभणी , हिंगोली तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांतील काही गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. जलसाठ्यांचे खोलीकरण, बंधाऱ्यांची दुरुस्ती, साठवण क्षमता वाढवणे अशा विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात एक नियमावली (SOP) देण्यात आली असून, त्यानुसार काम सुरू आहे. जल जीवन मिशन अंतर्गत निधीची कमतरता पडू देणार नाही, असा दावा केला.
दरम्यान, अल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासन सज्ज आहे. विधान परिषद निवडणूक यादी संदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलतील, असा सावध पवित्रा घेतला.