

नागपूर : मध्य रेल्वेने नागपूर विभागात १४ महिन्यांच्या कालावधीनंतर कापसाच्या गाठींची रस्त्यामार्गे होणारी वाहतूक पुन्हा रेल्वेमार्गे यशस्वीपणे सुरू केली आहे. मे. सीटीए लॉजिस्टिक्स, अहमदाबाद यांनी पिंपळगाव (पीएमकेटी) येथून मेटलर्जिकल अँड इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स (एमईटी), चेन्नई (१६२७ किमी) पर्यंत २१ बीसीएन (मिनी रेक) लोड केले असून रूपये १९.९२ लाख रुपयांचे उत्पन्न या मालवाहतूकीतून मिळवले आहे.
संबंधित कंपनीने अंदाजे १ लाख कापसाच्या गाठी उपलब्ध असल्याचे सूचित केले आहे. वेळेवर रेकचा पुरवठा व जलद वाहतुकीच्या अधीन राहून, जास्तीत जास्त वाहतूक रेल्वेमार्गाने करण्यास ते इच्छुक आहेत. ही कामगिरी नागपूर विभागातील टीमच्या सातत्यपूर्ण विपणन प्रयत्नांचा परिणाम आहे. तसेच, आपल्या ग्राहकांना कार्यक्षम आणि विश्वसनीय रेल्वे सेवा प्रदान करण्याच्या टीमच्या समर्पण आणि वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.