

Tipu Sultan Remark Harshvardhan Sapkal
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप, काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले. हर्षवर्धन सपकाळ यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राहुल गांधीही त्यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदना असतील, तर त्यांनी पुढील तीन दिवसांत हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा राहुल गांधी हे या वक्तव्याचे समर्थन करत असल्याचा संदेश जाईल, असा आरोपही बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज आहे. अशा व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी व्हायलाच हवी. तसेच, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर गप्प न बसता, लाचारी पत्करण्याऐवजी तातडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान,या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करताना ठाकरेंनी आता लाचारी पत्करण्याऐवजी 'मविआ'तून बाहेर पडले पाहिजे असे स्पष्ट केले.
पुण्यात भाजपच्या निषेध आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अरेरावीबद्दल बावनकुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी जर काँग्रेस कार्यकर्ते वागणार असतील, तर संपूर्ण काँग्रेस पक्षच छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहे.
मुंबईतील मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेवरही बावनकुळे यांनी भाष्य केले. कंत्राटदाराला ठोठावण्यात आलेल्या दंडाचे त्यांनी स्वागत केले असले तरी, ही कारवाई पुरेशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारांवर केवळ आर्थिक दंड करून चालणार नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा,अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कामे कंत्राटदारांनी करू नये. सुरक्षा उपाय न करणाऱ्या कंत्राटदारांवर केवळ दंड नव्हे, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे यावर भर दिला.
भारतीय जनता पक्षाकडून देशभरातील कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे आणि संघटन कौशल्य अधिक मजबूत करणे, हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बावनकुळे म्हणाले.