

Chandrashekhar Bawankule on revenue recruitment
नागपूर: राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतीबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.३) माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतीबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाचा शेवटचा आकृतीबंध 2006 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतीबंधासाठी अनेक आंदोलन केली होती. अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये, 8 नवीन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालये, 2 नवीन तहसीलदार कार्यालये आणि 69 अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत. विकास प्रक्रियेत प्रशासकीय सुधारणा अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही ती करून दाखवली. यासोबतच यावर्षी सुमारे 750 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान,बारामती मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, दिवंगत अजित पवार यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध लक्षात घेता काँग्रेस, वंचित आणि रासप पक्षांने उमेदवार देऊ नये. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न व्हावेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार घेतील.
राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेक्षण करून मदत देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व पालकमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अनियमिततेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून यासंदर्भात सोमवारी बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्जमाफी संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज माफ झाले पाहिजे. फार्महाऊस, वाहन खरेदी किंवा इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाला माफी देऊ नये ही भूमिका आहे.
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, जादूटोणा किंवा अशा गोष्टींमुळे अपघात होत नाहीत. अशा विधानांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत महिला आरक्षणाच्या दिशेने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगितले. जिल्ह्यात बालविवाह प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक बोगस शाळांवर योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.