

Devendra Fadnavis on Bihar elections
नागपूर : निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. कुठल्याही पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी, आपल्या चुका कबूल करता यायला हव्यात, तसेच आत्मपरीक्षणही करता आले पाहिजे. परंतु, आमच्या विरोधी पक्षाला हे मान्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे.
बिहारमधील विधानसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते आज विविध कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आम्ही ज्या योजना राबवल्या, त्या लोकांना आवडल्या, म्हणूनच लोकांनी आमच्यावर प्रेम दाखविले. खऱ्या अर्थाने, विविध प्रकारच्या योजना राबवण्याची सर्वांना मुभा होती. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत जल, जंगल आणि जमीन यावरील आदिवासींच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या जन्मदिनाची 150 वी जयंती जनजाती कल्याण दिवस म्हणून आपण साजरी करत आहोत. हे संपूर्ण वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ साजरे करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशभर विविध कार्यक्रम यानिमित्ताने होत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेतली असे सांगितले. राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या दहशतीसंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतोय किंवा स्वतंत्र, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण, कशाप्रकारे लढतोय, हा त्यांचा निर्णय आहे.