

bhaskar jadhav Maharashtra Winter assembly session: नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि. ८) सुरूवात होत आहे. यंदाच्या विधीमंडळाचे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडण्याची शक्यता आहे. यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी सरकावर कडाडून टीका केली.
त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी '10% सदस्यसंख्या' आवश्यक असल्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना 'अज्ञानी' आणि 'कोत्या बुद्धीचे' म्हणत लोकशाहीतील सभ्यतेची आठवण करून दिली आहे.
भास्करराव जाधव यांनी आक्रमकपणे स्पष्ट केले की, घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्यसंख्या असण्याची अट कुठेही नाही. "मी 10 वेळा बोललो, पण तुम्ही पत्रकार एकच बाजू दाखवता. कायद्यात किंवा घटनेत अशी कुठे तरतूद आहे, हे त्यांनी दाखवलं पाहिजे." असं म्हणत जाधव यांनी पत्रकारांवर देखील निशाणा साधला.
भास्करराव जाधव पुढे म्हणाले, "माननीय मुख्यमंत्र्यांच्याच विधिमंडळ सचिवांनी मला लेखी पत्र दिले आहे की अशा पद्धतीने 10% सदस्यसंख्येची अट कुठेही नाही. त्यांनी त्या पत्राचे वाचन करावे. झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण ढोंग केलेल्या/सोंग केलेल्या माणसाला जागं करता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे समजून घ्यावं."
जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर सत्तेसाठी खोटं बोलत असल्याचा आणि सत्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदेत (दिल्लीत) 10% सदस्य संख्या नसल्याने विरोधी पक्षनेतेपद दिले नव्हते, असा दावा केला होता. यावर पलटवार करताना जाधव यांनी दिल्ली विधानसभेचे उदाहरण दिले.
'ज्या वेळेला दिल्लीत आप (AAP) चे सरकार होते त्यावेळी आपचे ७० पैकी ६७ आमदार होते. भाजपचे फक्त तीन आमदार होते. तीन सदस्य असलेल्या पक्षाने विरोधी पक्षनेतेपद घेताना 'जनाची नाही मनाची' बाळगली होती का? याचे उत्तर दिले पाहिजे.' अस वक्तव्य जाधव यांनी केलं.
भास्करराव जाधव यांनी सरकारवर टीका करताना त्याची धार चांगलीच वाढवली. राज्य सरकार हे कोत्या मनाचे अन् दुष्ट बुद्धीचे आहे. घेताना तुम्हाला सदस्य संख्या आठवत नाही देताना मात्र सदस्य संख्या आठवते.' असा टोमणा देखील जाधव यांनी मारला.
ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांनी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद देण्याची उदात्त परंपरा जपली होती, असे सांगत त्यांनी जुनी उदाहरणे दिली. 1985 ते 1990 या काळात ज्या पक्षाचे दोन, तीन किंवा चार आमदार होते, त्यांनाही विरोधी पक्षनेतेपद देण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. त्यांनी निहाल अहमद, मृणालताई गोरे, दि. बा. पाटील, दत्त नारायण पाटील, रा. सू. गवई यांची उदाहरणे दिली.
दरम्यान, भास्करराव जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे हे आपले नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी देतील की नाही याबाबत बोलताना ते म्हणाले, 'तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु सरकारने पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे.'