

नागपूर : अमरावती परतवाडा येथील ‘लव्ह गुरू’ प्रकरणावर माध्यमांसमोर उलट सुलट वक्तव्ये करू नका, शांतता ठेवा अशा कानपिचक्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना केले. माजी खासदार नवनीत राणा, अनिल बोंडे आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना एकप्रकारे त्यांनी संयमाचे आवाहन केले.
बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी अत्यंत गंभीरपणे सुरू आहे. पोलिसांकडून फॉरेन्सिक व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तपास केला जात आहे. “अंतिम अहवाल येईपर्यंत कोणतीही राजकीय चर्चा टाळावी,” असे आवाहन त्यांनी केले. अमरावती प्रकरण किंवा इतर संवेदनशील मुद्द्यांवर अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणत्याही नेत्यांनी सार्वजनिक वक्तव्य करू नये, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर शेळके यांच्या अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर त्यांनी माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ती पोलिसांना द्यावी. त्यांनी चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले. टीसीएस प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गंभीरपणे लक्ष देऊन आहेत.
या गुन्ह्यात असलेला प्रत्येक आरोपी होणार आहे. त्या प्रकरणात गोपनीयता असल्याने त्याची वाच्यता करणे योग्य नाही. या प्रकरणाची वाच्यता करण्यापेक्षा अंतिम अहवाल येऊ द्यावा. पोलीस या सगळ्या संदर्भात माहिती देतील असेही बावनकुळे म्हणाले.
पाणीटंचाईबाबत इशारा,50 टक्के बचतीचे संकेत
राज्यात कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याची काटकसर करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणी वापरात ५० टक्के बचत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.