

Awaz Maharashtracha Nagpurchya Parivartanacha
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर येथे “आवाज महाराष्ट्राचा – नागपूरच्या परिवर्तनाचा” या जनआंदोलनात्मक अभियानाची घोषणा करण्यात आली. शहरातील वाढत्या नागरी समस्या, बेरोजगारी, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई, प्रदूषण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की, नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरातही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या अभियानांतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, प्रभावी वाहतूक व्यवस्था, बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मिती, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, महानगरपालिका रुग्णालयांच्या सुविधा उंचावणे, पर्यावरण संवर्धन तसेच झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी शहरभर नागरिक संवाद, जनआंदोलन, निवेदन मोहीम, विभागनिहाय बैठका आणि जनजागृती कार्यक्रम राबविणार आहेत. “संवाद • संघर्ष • समाधान” या भूमिकेतून नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी लढा उभारला जाईल, असेही आयोजकांनी स्पष्ट केले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत वाढती महागाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमास सहप्रभारी नवज्योत सिंग संधू, नागपूर झोन इन्चार्ज व उपाध्यक्ष कपिल ढोके, उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, अनुराग भोयर, महासचिव अभिषेक धवड, रितेश पांडव, रौनक चौधरी, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, सागर चव्हाण, अनुष्का वानखेडे, प्रदेश सचिव निखिल वानखेडे, श्रीकांत ढोणे, राधिका देशमुख, रोमा चौधरी, मेहुल आडवाणी, हेमंत कातुरे, धीरज धकाते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.