Nagpur News |असे अधिवेशन बघितलेच नाही, अनिल देशमुख संतापले!
नागपूर - इतकी वर्षे विधानसभा सभागृहात होतो, पण यंदाच्या अधिवेशनारखे असे प्रकार यापूर्वी बघायला मिळाले नव्हते असा संताप माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशनात कृषिमंत्री बेजबाबदारपणे वागल्यावरून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे. देशमुख म्हणतात, आपल्या महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत.
नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, बँकांचे सावकारांचे कर्ज, शेतमालाचे पडलेले बाजारभाव या सगळ्या समस्यांमुळे राज्यातील बळीराजा आज हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचे पैसे यांनी दीड वर्षापासून अडवून ठेवले आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असताना कृषीमंत्री सभागृहात जंगली रमी खेळतात हे धक्कादायक आहे. इतकी वर्षे सभागृहात होतो, पण यंदाच्या अधिवेशनारखे असे प्रकार यापूर्वी बघायला मिळाले नव्हते असे देशमुख यांनी म्हटले आहे.

