१०० दिवस उलटले तरी आरोपींना अटक का नाही? रामझुला प्रकरणी अनिल देशमुखांचा सवाल

१०० दिवस उलटले तरी आरोपींना अटक का नाही? रामझुला प्रकरणी अनिल देशमुखांचा सवाल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस पुण्यातील भीषण अपघात, हिट अँड रन चर्चेत असताना फेब्रुवारी महिन्यात रामझुला येथे मध्यरात्री कारच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. याच महिन्यात राजनगर येथे भरदिवसा प्रसिध्द फोटोग्राफरची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणाला १०० दिवस उलटुनही यातील आरोपीला अद्यापही अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश का आले नाही ? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्त त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आज या तिनही कुटुंबीयांची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली.

२५ फेब्रुवारी २०२४ रोजी रामझुला येथे अपघातात जाफरनगर येथील मोहम्मद आतीफ (वय ३३) व मोहम्मद हुसैन मुस्तफा (वय ३४) या युवकांचा मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबियांची अनिल देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यात प्रामुख्याने अपघातानंतर कार चालवित असलेल्या महिलेला सोडून का देण्यात आले? वैद्यकीय तपासणी सात तासानंतर का करण्यात आली? पोलिसांनी घटनास्थळावरुन दारुच्या बॉटल का फेकल्या व पुरावे नष्ट करण्यात आले. फारेंसिक टिमकडून गाडीची तपासणी का करण्यात आली नाही? अपघातग्रस्त कार सुर्पुदनामा न घेता सोडताना पोलिसांनी परस्पर कशी सोडली ? पुणे येथील प्रकरणात जसा राजकीय दबाव होता, तसा दबाव या प्रकरणातून नागपूर शहर पोलिसांवर तर नव्हता ना ? असे अनेक प्रश्न कुटुंबीयांनी यावेळी उपस्थित केले.
राजनगर येथील प्रसिध्द फोटोग्राफर विनय पुणेकर यांची भरदिवसा २४ फेब्रुवारी २०२४ ला हत्या करण्यात आली. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली. विनय यांची गोळया झाडून हत्या करणारा आरोपी हेमंत शुक्ला याला अद्यापही अटक करण्यात आली नाही. विनय यांच्या कुटुंबीयाची भेट घेतली असता आरोपीला अटक करण्यासाठी नागपूर पोलिस दिरंगाई करीत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. यावेळी वेदप्रकाश आर्य, जावेद हबीब, सैयद फैज्जुला, नुतन रेवतकर, रेखा कृपाले, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंग, अनिल बोबडे, हाजी आसीफ, विश्वजीत सावडीया, सारंग साकरे, रिजवान अंसारी, संदीप मेंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांची भेट

दरम्यान, अनिल देशमुख यांनी पिडीत कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पोलिस आयुक्त रविद्र सिंगल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही प्रकरणाची संपूर्ण माहिती अनिल देशमुख यांना दिली. यावेळी तपास करणारे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. या दोन्ही प्रकरणातील कुटुंबीय सोमवारी दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्त यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news