

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२ (भाजप) तर २६ (शिंदे अजित पवार गट) असा ठरल्याची चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात घुमजाव केले. फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत इन्कार केला आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप चर्चा व्हायच्या असून हे आपण यापूर्वीही स्पष्ट केले आहे. अद्याप कुठलाही फॉर्म्यूला ठरलेला नाही. गेल्यावेळी जो पक्ष ज्या जागा लढलेला आहे, त्याच जागा त्याच्याकडे असाव्यात, हा मुख्यत्वे या चर्चेचा आधार राहणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, हा फक्त चर्चेचा आधार असून तो अंतिम निर्णय नाही. इलेक्टिव्ह मेरीटनुसार त्यात आवश्यक ते बदलही आम्ही आपापसात बोलून करणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसाच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आढावा घेऊन नुकसानीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आपण त्यांना मदत करतोच. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बीची वेगवेगळी स्थिती आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त नुकसान होईल. जिथे नुकसान होईल, तिथे मदत होणार, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :