

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उष्म्याने लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. विशेषतः चंद्रपूर यवतमाळमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भातील ब्रम्हपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथील कमाल तापमान आज शनिवारी ४१ अंश सेल्सियसवर पोहोचले. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील तापमानाचा पारा ४० अंशांवर राहिला.
दरम्यान, १५ ते १८ मार्चदरम्यान ओडिशा, १५ ते १७ मार्च दरम्यान सौराष्ट, कच्छ, १५ ते १६ मार्चदरम्यान झारखंड, पश्चिम बंगालचे गंगा क्षेत्र, छत्तीसगड, विदर्भ, उत्तर तेलंगणा आणि १८ ते १९ मार्चरम्यान उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत ईशान्य भारतातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस अथवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अधिकवेळ उष्ण वातावरणात राहणे टाळावे.
पुरेसे पाणी प्या.
हलक्या वजनाचे सैल, सुती कपडे घाला.
उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर ओले कापड, टोपी आणि छत्रीचा वापर करा.