

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक आपत्तीत पीक, जनावरे, मालमत्तेचे नुकसान झालेल्या पात्र शेतकर्यांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यानुसार गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाईसाठी ६७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वळती करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील ४ हजार ८८१ शेतकर्यांची ई-केवायसी झाली नसल्याने त्यांच्यावर मदतीपासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे घरे, गुरे, साहित्य व पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्ष पंचनाम्याअंती नुकसान भरपाईस पात्र शेतकर्यांच्या याद्या प्रमाणित करून संबंधित तहसीलदारांमार्फत संगणकीय प्रणालीवर अपलोड केले जात आहे. यात ४२ हजार शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
अपलोड करण्यात आलेल्या यादीची शासनस्तरावरून पडताळणी होऊन माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधित क्षेत्र, मदतीची रक्कम आदी तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी संगणकीय प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेली आहे. यानुसार पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जामा करण्यात आली. ज्यामध्ये ज्या शेतकर्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली त्या शेतकर्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ४ हजार ८८१ शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केली नसल्याने या शेतकर्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकली नाही. त्यामुळे ८ कोटी पेक्षा अधिक रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे. तेव्हा, पात्र शेतकर्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे २५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यात जून २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकर्यांची यादी पोर्टलवर अपलोड करून देण्यात आली. ज्यामध्ये जिल्ह्यातील ४२ हजार शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले.
शेतकर्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक गोंदिया तालुक्यात २ हजार ४३९ शेतकरी, आमगाव ८२४, तिरोडा ५१७, गोरेगाव ४८७, सालेकसा २६१, अर्जुनी मोर १८६, सडक अर्जुनी ११२ व देवरी तालुक्यातील ५५ असे ४ हजार ८८१ शेतकरी लाभापासून वंचीत आहेत.