गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरदिवशी तुरळक पावसाची नोंद होत आहे. यावेळी रविवारी (दि.9) रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी सुस्थितीत ठेवण्यासाठी धरणाचे वक्रद्वार उघडण्यात येत आहे. यानुसार सोमवारी (दि.9) पुजारीटोला धरणाचे १३ वक्रद्वार उघडण्यात आले असून त्यामधून १२७६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तेव्हा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, धरण सुस्थितीत ठेवण्यासाठी पुजारीटोला धरणाचे ११ दरवाजे ०.३० मीटरने तर २ वक्रद्वार ०.६० मीटरने उघडण्यात आले आहे. ज्यामधून (३४४ क्युमेक ) १२७६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तेव्हा संबंधित विभागाकडून जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आह.
पुजारीटोला धरणाचे १३ वक्रद्वार उघडण्यात आले असताना जिल्ह्यातील सिरपूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे ७ वक्रद्वार (गेट) ०.३० मीटरने सुरू करण्यात आले आहे. यामधून १८२.१४ क्युमेक ( ६४३२.०९ क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.