वर्धा, पुढारी वृत्तसेवा: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्धा जिल्ह्यातही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण अधिक आहे. मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक आहे. वर्धा जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८९.०४ आहे. जिल्ह्यात ८०.११ टक्के मुले बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. (HSC Result)
गुरुवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसह शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे निकाल सर्च केलेत. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेकरिता ८१९२ मुले, ७९३१ मुली असे मिळून १६१२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१४३ मुले तर ७८८९ मुली असे १६०३२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात ६५२४ मुले आणि ७०२५ मुली असे १३ हजार ५४९ परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत.
हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची लक्ष्मी सुरेश गजराणी हिला सर्वाधिक ९६.३३ टक्के गुण मिळाले. (HSC Result) हिंगणघाटच्या होली फेथ वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती मातुरे हिला ९५.६७ टक्के गुण मिळाले आहेत. वर्ध्यातील न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचा सोहम मनोज कोल्हटकर, हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी केतकी अभय शिंगोटे, न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाची जान्हवी राजेश पुनसे या तिघांना ९४.५० टक्के गुण मिळाले आहेत.
आष्टी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक ९४.८८ टक्के आहे. वर्धा तालुका ८९.९६, आर्वी ७२.४३, देवळी ८७.३४, हिंगणघाट ८२.३३, कारंजा ७२.७९, समुद्रपूर ८२.८० आणि सेलू तालुक्याचा निकाल ७६.९५ टक्के लागलेला आहे. (HSC Result)