![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2Fearthquake-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे आज (दि.२१) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिस्टर स्केल इतकी होती. जमिनीच्या ५ किलोमीटर आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी ८.४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता जिल्हा प्रशासनाकडे अजून तशी माहिती नाही. माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा