

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मनापासून इच्छा असेल आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतीही बाब अशक्य नाही; त्यातल्या त्यात राज्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणाऱ्या लोकनेत्याला अगदी छोटीशी नकारात्मक बाबही अस्वस्थ करुन जाते. मग त्यात सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे संवेदनशील नेते असतील तर ते स्वस्थ कसे बसणार ?
त्याचे असे झाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर दिल्लीत संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट नाही ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आली. आपले खाते आणि पर्यायाने राज्य कुठेच मागे असू नये यासाठी सतत आग्रही असलेले ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने आढावा घेतला; कारणे जाणून घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना फोनवरून संपर्क साधला.
दोन्ही नेत्यांमधील संवाद सुरू झाला. अत्यंत पोटतिडकीने सुधीरभाऊ महाराष्ट्राची बाजू मांडत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथवर परेडमध्ये माझा महाराष्ट्र दिसला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्र्यांना केली. मुनगंटीवार यांच्या विनंतीमागील भाव आणि आर्तता याची दखल राजनाथ सिंह यांनी घेतली. दिल्ली येथील परेडमध्ये आता २६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. शुक्रवारी 23 डिसेंबर 2022 रोजी या संदर्भातील पत्र केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट करून घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारचे व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले आहेत.
अधिक वाचा :