चंद्रपूर : विवाहबाह्य अनैतिक संबधातून पत्नीनेच पतीचे हत्या केल्याची घटना चंद्रपूरातील ताडी हिरापूर गावात समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात या घटनेचे बिंग फोडले असून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर हरविल्याची तक्रार दाखल केली. अशी खळबळजनक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पतीचा मृत्तदेह अद्याप सापडलेला नाही. रामदास रावसाहेब नंदेवाड (वय.28) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी रेणुका रामदास नंदेवाड आणि श्रीनिवास बापूराव घंटेवाड यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.५) सप्टेंबरच्या सायंकाळी रामदास नंदेवाड हा आपल्या कुटुंबीयांना सांगून शेणगावला गेला होता. परंतु तो रात्री घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी पत्नी रेणुका हिने जिवती पोलीस स्टेशनमध्ये पती हरविल्याची तक्रार दाखल केली. तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पत्नी रेणुका आणि प्रियकर श्रीनिवास यांच्यातील विवाहबाह्य प्रेमसंबंधाची माहिती उघड झाली. सखोल झालेल्या चौकशीत पत्नीने प्रियकर आरोपीही मिळून हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी, श्रीनिवासने मृतक रामदासला गडचांदूरच्या देशी दारू दुकानातून दारू पाजली. त्यानंतर त्याला (टीएस 20 टी 7196) क्रमांकाच्या ऑटोरिक्षात बसवून राजुरा रोडकडे नेले. वाटेतच श्रीनिवासने रामदासच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला वर्धा नदीच्या पुलावरून खाली फेकले. अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.