

चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करीचा फटका आता थेट वन्यजीवांना बसत असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे. जुनोना जंगल परिसरात आज पहाटे रेती वाहून नेणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने एका सांबरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सांबार गंभीर जखमी झाले असून त्याचे मागचे दोन्ही पाय तुटले आहेत. जबडा, मान तसेच शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४८८ मधील जंगल परिसरात घडली. रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा जंगलातील मार्गाने जात असताना अचानक समोर आलेल्या सांबरला जोरदार धडक बसली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेतील सांबरला तातडीने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळू तस्करी आता जंगल मार्गांपर्यंत पोहोचली आहे. महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे धाडस वाढले असून जंगलातील चोरमार्गांचा वापर करून रात्री-अपरात्री अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने वन्य प्राण्यांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे बेकायदा वाळू तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची पर्यावरण प्रेमी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी जंगल मार्गांवरील अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून संबंधित वाहनचालक आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त मोहीम राबवून जंगलातील अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे.