

Ghodazari Sub Canal Water Release
चंद्रपूर : तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत घोडाझरी उपकालव्यातून सोमवारी (दि. २०) सकाळी ७ वाजता प्रथमच पाणी सोडण्यात आले. ५५ किलोमीटर लांबीच्या या उपकालव्यामुळे ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील सुमारे २८ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून कोरडा पडलेला कालवा अखेर पाण्याने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून घोडाझरी उपकालव्यात दि. २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता पाणी सोडण्यात आले. यापूर्वी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता सुहास मोरे, उपअभियंता आकाश शेडगे, शाखा अभियंता संजय नंदनवार यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.
घोडाझरी उपकालवा हा ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथून सुरू होऊन सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूरपर्यंत ५५ किलोमीटर अंतराचा आहे. या कालव्यामुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून परिसरातील शेतीला कायमस्वरूपी पाण्याचा आधार मिळणार आहे. या उपकालव्याच्या कामाचा शुभारंभ सन २०१० मध्ये झाला होता. मात्र विविध कारणांमुळे आठ ते दहा वर्षे काम बंद राहिल्याने प्रकल्पाला मोठा विलंब झाला. अखेर २०२५ मध्ये कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या सोडण्यात आलेले पाणी नागभीड तालुक्यातील जीवनापूरपर्यंत पोहोचणार असून लाखापूर ते जीवनापूर हे अंतर सुमारे ४४ किलोमीटर आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूरपर्यंत काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने पुढील वर्षी कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नागभीड तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने खरीप पिके संकटात आली होती. त्यामुळे घोडाझरी उपकालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी संघटना आकापूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. जनकापूर–आकापूर–गंगासागर हेटी मार्गे कालव्यात पाणी सोडण्यासाठी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक आमदारांकडेही यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.
अखेर सर्व स्तरावरील पाठपुराव्याला यश मिळाले आणि दि. २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता जनकापूर–आकापूर–गंगासागर हेटी मार्गे जाणाऱ्या घोडाझरी उपकालव्यात पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वाढोणा, गंगासागर हेटी, उश्राळ मेंढा, सावरला आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या कालव्यातून वाहणारे पाणी पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.
सुमारे पंधरा वर्षांपासून या कालव्यातून पाणी वाहण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. दरवर्षी नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसरातील शेती सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास शेतकऱ्यांसह प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अखेर कोरड्या कालव्यातून जीवनदायी पाणी वाहू लागल्याने हा दिवस नागभीड ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.