

Warora taluka Asala village flood bus stop
चंद्रपूर : वरोरा तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे टोकाच्या गावांतील विद्यार्थ्यांची शाळा- कॉलेजला येणारी बस तब्बल चार तास शुक्रवारी नाल्यावर अडकून पडली. आसाळा व भटाळा गावांच्या मधील नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद झाली. लहान मुलांची भूक पाहून स्थानिक नागरिकांनी जेवण दिले, मात्र प्रशासनाला माहिती मिळताच तातडीने मदत पोहोचवून विद्यार्थ्यांना सुरक्षित त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले.
वरोरा तालुक्यातील येरखेडा, आबमक्ता, पारडी, साखरा, लोदीखेडा, वडगाव खेमजई या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी वरोरा येथे ये-जा करतात. काल ढगफुटी सदृश पावसामुळे नाल्याला मोठा पूर आला आणि शेगाव – टेमूर्डा मार्गावरील आसाळा आणि भटाळा या गावांदरम्यान असलेला नाला ओसंडून वाहू लागला. त्यामुळे सायंकाळी गावाकडे परतणारी मानवविकास मिशनची बस नाल्यावरून जाण्यास असमर्थ ठरली आणि सुमारे ६० ते ७० विद्यार्थ्यांसह थांबली.
चार तासांहून अधिक वेळ बस अडकून पडली. लहान मुलांची भूक आणि अस्वस्थता पाहून स्थानिकांनी त्यांना जेवण उपलब्ध करून दिले. आश्चर्य म्हणजे इतका वेळ गेल्यानंतरही प्रशासनाला ही बाब समजली नव्हती. ही माहिती वरोरा येथे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांना मिळताच त्यांनी तातडीने प्रशासनाला कळवले.
त्यानंतर तहसीलदार योगेश कौटकर, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, तलाठी रितेश आमटे, सुनील राऊत, शेगाव मंडळ अधिकारी अजय निखाडे, कोतवाल राजू चांदेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नाल्याचे पाणी कमी झाल्यावर बस सुरक्षितपणे पुढे रवाना करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्यात आले.