चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघ आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष आता नेहमीचा झाल्याचे चित्र दिसते. कधी जंगलात तर कधी गावाशेजारी वाघांनी मनुष्यांचा बळी घेतलेला आहे. आता तर थेट गावात येऊन वाघ मनुष्यांच्या जीव घेत आहेत. सोमवारी मध्यरात्री चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल या गावी अंगणात खाटेवर झोपलेल्या एका 53 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. मंदा एकनाथ सिडाम असे मृत्तक महिलेचे नाव आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक रात्रीच्या वेळेला अंगणात झोपतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल या गावातील 53 वर्षीय महिला मंदा एकनाथ सिडाम ही सोमवारी रात्री स्वतःचे घराच्या अंगणात झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने गावात प्रवेश करून अंगणात झोपलेल्या वृद्ध महिलेवर हल्ला केला आणि जागीच ठार केले. वाघाने हल्ला केल्यानंतर महिलेने प्रचंड आरडाओरड केली,त्यामुळे शेजारील नागरिक धावून आले. नागरिकांच्या धावून येण्याने वाघाने गावातून धूम ठोकली, परंतु तो पर्यंत वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला होता.
सदर घटनेची माहिती सावलीचे वन विभागाता माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंरत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सावली तालुक्यातील विरखल या गावात अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने ठार केल्यामुळे गावात व परिसरात प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरात 53 जणांचा बळी वाघाने घेतलेला आहे. त्यामध्ये एकट्या सावली तालुक्यातील 20 जणांचा समावेश आहे. आठवडाभरापूर्वी यास तालुक्यातील 5 वर्षाच्या हर्षलचा वाघाने बळी घेतल्याची घटना अगदि ताजी आहे. त्यानंतर वृद्ध महिलेचा जीव गेल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
.हेही वाचा