

Ashadi Wari 2026 Sant Gajanan Maharaj Palkhi
बुलढाणा: विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. पायीवारीचे हे 57 वे वर्षे आहे. या पायी वारीमध्ये 700 पेक्षा अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत.
टाळ मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. शेगाव ते पंढरपूर 750 किलोमीटरचा 33 दिवसात प्रवास करून पालखी 23 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सहभागी होऊन 28 जुलै पर्यंत पालखीचा पंढरपुरात मुक्काम असणार आहे. त्यानंतर पालखी शेगावसाठी परतीच्या मार्गावर प्रस्थान करणार आहे. आज यानिमित्ताने लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले असून, गण गण गणात बोतेच्या जयघोषाने संपूर्ण संत नगरी दुमदुमली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार असून, त्यासाठी देहू नगरीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या या पालखी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू ते पंढरपूर नेण्यासाठी नवीन चांदीचा रथ तयार करण्यात येत आहे. या रथामुळे यंदाचा पालखी सोहळा अधिक भव्य आणि दिमाखदार ठरणार आहे.
या नव्या रथाच्या निर्मितीसाठी विश्वस्तांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, राजस्थानमधून आलेले कुशल कारागीर रथाच्या सुट्या भागांवर आकर्षक कलाकुसर करत चांदी मढविण्याचे काम करत आहेत. रथावरील नक्षीकाम, कलात्मक रचना आणि पारंपरिक शैली यामुळे हा रथ वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदाचा ३४१ वा पालखी सोहळा नव्या चांदीच्या रथामुळे अधिकच लक्षवेधी ठरणार असून, देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.