

Mohadi Andhalgaon Handloom Success Story
राजू मस्के
भंडारा: पूर्वीपासून सुरू असलेल्या रेशीम कापड विणकामाला आधुनिकतेची जोड देत उत्पादीत मालाला देशपातळीवर नेण्याचे कार्य मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील ग्रीष्मा महिला स्वयंसहायता गटाने केले आहे. या गटाने तयार केलेल्या साड्या व अन्य कापडांना देशपातळीवर मोठी मागणी आहे. या गटाच्या अध्यक्षा साधना निनावे व त्यांच्या सहकारी महिला तसेच साधना यांचे पती गोपीचंद निनाने यांनी आदर्श तयार केले आहे.
गोपीचंद आणि साधना निनावे या आंधळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. आंधळगावात पुर्वजांच्या काळापासून सुरु असलेला व्यवसाय म्हणजे टसर करवती साडी विणकाम. याच व्यवसायामुळे आंधळगावचे नाव देशपातळीवर गाजले होते. नंतरच्या काळात या व्यवसायात उतरती कळा आल्याने ते लोप पावत गेले. त्यामुळे आपल्या गावाची संस्कृती अशीच कायम राहावी म्हणून या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचे त्यांनी ठरविले. साधना आणि त्यांचे पती गोपीचंद या दोघांनीही मिळून हाच व्यवसाय सुरु करण्याचा ठाम निश्चय केला.
आंधळगावात टसर सिल्क साडी तयार करणारे कारागीर आहेत. त्यांच्या निर्मीत साडीला देशभरातून विविध शहरात खूप मागणी आहे. त्यामुळे त्यांनी जुने कारागीर शोधायला सुरुवात केली. ज्यांनी काम बंद केले होते, त्यांना विनंती व त्यांच्याशी चर्चा करून कामावर घेतले. अखेरीस व्यवसाय सुरू झाला. त्यांनी गावातच एक छोटीशी इमारत बांधून या व्यवसायाला सुरुवात केली.
या व्यवसायासाठी रेशीम धागा महत्वाचा असतो. पण तो अधिक किमतीचा असतो. त्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक पेच निर्माण झाला. हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी उमेद अभियानाकडे धाव घेतली. उमेद अभियानात काम करणाºया करुणा चोपकर, मनीषा रोडे, तुरणकर यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी ग्रीष्मा महिला स्वयंसहायता समूह गटाची स्थापना केली. या गटाला उमेद अभियानाशी जोडून हिरकणी प्रभागसंघ आंधळगाव अंतर्गत त्यांना कर्ज मिळाले. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला चांगली गती आली. आज त्यांच्या निर्मीत रेशीम साड्या, शर्ट कापड, दुपट्टे, शॉल इत्यादी विविध प्रकारचे कापडविक्रीसाठी संपूर्ण देशात प्रदर्शनीमध्ये पाठविले जाते. त्यातून त्यांच्या मालाला चांगली किमंत मिळते. नवनवीन व्यापारी वर्गांशी त्यांचा संपर्क जुळतो. त्यांना त्याचा फायदा होतो.
टसर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा उल्लेख २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये केल्याने भंडाराच्या टसरचे महत्व वाढले आहे. भंडारा जिल्ह्यातील टसर आणि त्यापासून उत्पादीत होणाऱ्या मालाची दखल घेण्यात आल्याने जिल्ह्यात टसर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांच्या वतीने आयोजित सन २०२४-२५ च्या राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये गोपीचंद भोजराज निनावे यांच्या उत्कृष्ट हातमाग कापड वाणाची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मंत्रालय, मुंबई येथे ५ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान राष्ट्रीय हातमाग दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ७ |ऑगस्ट २०२६ रोजी निनावे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.