भंडारा, पुढारी वृत्तसेवा : पवनी येथून भेंडाळा (चौ) कडे जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी वैनगंगा नदी पुलावर धानाचे पोते भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. यात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) सायंकाळी घडली. पियुष गजानन राजभोयर (वय १७, मु. भेंडाळा ) आणि निलेश श्रीपत मेश्राम (वय २४, मु. दहेगाव तह. लाखांदूर) अशी मृत तरुणाची नावे आहेत. Bhandara News
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी भेंडाळा(चौ) येथे मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उत्सव बघण्यासाठी मृत निलेश मेश्राम मित्रासह हा भेंडाळा येथे सोनटक्के यांचे घरी पाहुणा म्हणून आला होता. सायंकाळी दोघेही पवनीला दुचाकीने गेले होते. कामे आटोपून गावाकडे परतत असताना वैनगंगा नदी पुलावर उभ्या असलेल्या गुड्डू रघुते मु. कुर्झा यांच्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. Bhandara News
यावेळी दोघांनाही गंभीर दुखापत झाली. ही माहिती पसरताच बघ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय निखिल राहाटे करीत आहेत.
विजेअभावी दिवसेंदिवस पुलावरील अपघाताच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. ट्रॅक्टरला इंडिकेटर व रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वारास ट्रॅक्टर दिसले नाही. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. पुलावर प्रकाशाची व्यवस्था असती तर कदाचित अनर्थ टळला असता? प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन वैनगंगा नदी पुलावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था लावण्याची मागणी प्रवासी वर्गांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा