भंडारा : चारा-पाण्याअभावी दगावली ३४ जनावरे
भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील धानोरी गावापासून एक कि.मी. अंतरावरील शेतात बुधवारी (दि. 6) सकाळी जनावरे मृतावस्थेत असल्याची माहिती शेतकर्यांनी पोलिस पाटील यांना दिल्यानंतर 34 गोवंशीय जनावरे मृत व 25 जनावरे जखमी व 40 च्या वर जंगलात इतरत्र निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या जनावरांची तस्करी केली जाणार होती. याप्रकरणी एका बनावट गोशाळा संचालकाला अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी गो तस्करी करणारे वाहन पकडले होते. याची माहिती मिळताच पोलिसांना आपली गोशाळा असल्याची बतावणी करून पवनी येथील विसर्जन चौसरे या गो तस्कराने जवळपास 100 पेक्षा जास्त गोवंशीय जनावरे आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर गोशाळा नसलेल्या धानोरी येथील शेतात ट्रकमध्ये ही जनावरे निर्दयीपणे कोंबून आणली. या जनावरांची पुन्हा कत्तलीसाठी तस्करी केली जाणार होती. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे चारा-पाण्याअभावी 34 जनावरे दगावली.