अमरावती : मागील तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहे. अशावेळी विटाळा येथे पुराच्या पाण्यात दुचाकीसह दांपत्य वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि.2) घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विटाळा येथून पती-पत्नी आपल्या दुचाकीने पुलगाव येथे काही कामानिमित्त जात होते. तेव्हा विटाळा पुलावरून जाताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी सरळ पुलाच्या खाली कोसळली.
त्यामुळे पती-पत्नी दोघेही दुचाकीसह पुलाखालील नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला असल्याने बहुतांश रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे. याच दरम्यान मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे हद्दीत येणार्या पुलावर ही दुर्घटना घडली आहे. नदीला पूर असल्याने दुचाकीसह दोघेहीजण वाहून गेले. घटनास्थळी पोलिसांसह महसूल विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक शोधकार्यासाठी दाखल झाले आहेत. वाहून गेलेल्या दाम्पत्याचा शोध घेण्यात येत आहे.