

Ravi Rana on Uddhav Thackeray: आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत हनुमान चालीसा प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आणलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राणा यांनी ठाकरेंच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक वादग्रस्त विधानं केली.
रवी राणा यांनी आरोप केला की, “हनुमान चालीसा पठणाला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचं राजकीय साम्राज्य कोसळलं.” तसंच, त्यांनी ठाकरेंना आवाहन करत म्हटलं की, “जर त्यांना सध्याच्या संकटातून मुक्त व्हायचं असेल, तर त्यांनी घरी हनुमान चालीसा पठण करावं आणि अमरावतीच्या हनुमान गढीवर येऊन दर्शन घ्यावं.”
राणा यांनी ठाकरेंना सहकुटुंब अमरावतीतील हनुमान गढीवर येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी असंही म्हटलं की, “ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, त्यांनी संकटातून मुक्त होण्यासाठी हनुमान चालीसा पठण करायला हवं.” राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राणा म्हणाले की, “आगामी काळात देशात केवळ दोनच प्रमुख पक्ष राहतील भाजप आणि काँग्रेस.”
तसंच, त्यांनी दावा केला की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सुमारे 90 टक्के कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. अमरावतीतील हनुमान गढीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 121 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल राणा यांनी आभारही व्यक्त केले.
रवी राणा यांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. धार्मिक मुद्द्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, येणाऱ्या काळात यावरून आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.