अमरावती, पुढारी वृत्तसेवा: समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील. तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. अशा प्रकारे राज्य खड्ड्यात घातले जात असेल, तर ते चुकीचे आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून महायुती सरकारवर केली आहे. शनिवारी (दि.२८) अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये पगाराचे पैसे द्यायला देखील सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणले पाहिजेत. त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार दिला पाहिजे, असे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पश्चिम विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज (दि.२८) पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला जात आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या.
शेतकऱ्यांनी कधीही फुकट वीज मिळावी, म्हणून आंदोलन केले नाही. तरीही सरकारने फुकट वीज देण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी स्वतःच्या स्वार्थासाठी योजना राबवत असतील. तर ते योग्य नाही. सत्ताधारी आणि आज विरोधात असलेले कधीतरी सत्तेत होतेच. त्यांना माध्यमांकडून ज्याप्रकारे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. तसे प्रश्न विचारले जात नाहीत, असे सांगत ठाकरे यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली.