अमरावती, पुढारी वृत्तसेवा:
राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा पावसाळी अधिवेशनात जाहीर केली आहे. ही यात्रा लगेचच लागू होईल, अशी घोषणाही केली. या यात्रेसाठी राज्यभरातील तीर्थक्षेत्रांसह देशभरातील तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यात देशातील व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश झाला असला तरी अत्यंत लोकप्रिय आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा मात्र, सरकारने जाणून-बुजून समावेश केला नसल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी (दि.१) केला आहे.
राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा जाहीर केली. ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा शासन निर्णयही सरकारने जारी करून आपला मनोदय स्पष्ट केला आहे. मात्र, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेत राज्यासह देशातील 139 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील 66 तीर्थक्षेत्रांमध्ये नागपूर दीक्षाभूमी, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील गणपती मंदिर,नांदेड येथील गुरु गोविंद साहेब गुरुद्वारा, नांदेड जिल्ह्यातील रेणुका देवी मंदिर, माहूर येथील मंदिर यांचा या यादीत समावेश आहे तर देशातील सुवर्ण मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, वैष्णोदेवी अमरनाथ यात्रा, ओरिसा येथील जगन्नाथ पुरी यांचाही समावेश केला आहे.
मात्र, अमरावती जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी, एकवीरा देवी, महानुभाव पंथीयांची काशी मानलं जाणारं रिद्धपूर तसेच रखुमाईचे माहेर मानलं जाणारं तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर यांचा यात समावेश केलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने या तीर्थक्षेत्रांचा समावेश करावा आणि अमरावती जिल्ह्यातील तीर्थ पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.