

अमरावती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आक्रमक नेते बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी बच्चू कडू हे आज (दि.३०) शिवसेनेकडून (शिंदे गट) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे अन्य महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. या चर्चेअंती बच्चू कडू यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार असून, त्यासाठी शिंदे गटाकडून कडू यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
'प्रहार'चे विलीनीकरण, पण संघटना कायम
बच्चू कडू हे आपला 'प्रहार जनशक्ती पक्ष' अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करणार असल्याचे समजते. मात्र, त्यांची 'प्रहार सामाजिक संघटना' ही स्वतंत्र अस्तित्वात राहणार असून, त्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच राहील. बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती, त्यामुळे हा त्यांच्यासाठी एक प्रकारे 'स्वगृही' परतण्याचाच निर्णय ठरणार आहे.
विदर्भात मोठी जबाबदारी आणि मंत्रिपदाचे संकेत
विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही मोठी खेळी खेळल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. बच्चू कडू यांना विदर्भात शिवसेनेचा चेहरा म्हणून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. विधान परिषदेच्या आमदारकीसह पुढील सहा महिन्यांत त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भातील राजकीय समीकरणे बदलणार?
अपक्ष म्हणून आणि नंतर स्वतःच्या प्रहार पक्षाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत 'महायुती'सोबत आणि प्रामुख्याने शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.