

E-Bus Auto Collision Amravati
अमरावती : राजुरा बाजार-वरुड मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर बुधवारी (दि.१८) थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. एका भरधाव ई-बस आणि प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका शालेय विद्यार्थिनीचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राजुरा बाजार ते वरुड हा मार्ग मोठ्या वाहतुकीचा आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. आज प्रवाशांनी भरलेला ऑटो या मार्गावरून जात असताना ई बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि त्यामुळे ई-बसला ऑटोची भीषण धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये ऑटोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात रेफर करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वरुड पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य केले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.