

Amravati Collector on Bank Loan Recovery
अमरावती : मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शासनाने दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे बँकांनी शेतकर्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावू नये. यासाठी अग्रणी बँकेनी इतर बँकांसोबत संपर्क साधून सूचना द्याव्यात. मनरेगा अंतर्गत करण्यात येणार्या कामांसाठी दहा गावांचे एकत्रितरित्या पाच वर्षांचे नियोजन करून कामे करण्यात यावी. तसेच इंटरनेट सेवा नसलेल्या गावासाठी हजेरी नोंदणीसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत मिळणारे वेतन विनाविलंब मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
मेळघाटात प्रामुख्याने वन क्षेत्र असल्याने याठिकाणी होणारे रस्ते सुधारण्यासाठी वन विभागाची परवानगी गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाने यासाठी पुढाकार घेऊन रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मेळघाटात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यास येथील स्थलांतरण होणार नाही. तसेच शेतीमधील पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
मेळघाटातील २२ गावाच्या पारंपारीक विजेच्या प्रश्नाबाबत राज्याकडून केंद्रीय वन्यजीव मंडळाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंडळाची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी विजेची कामे होण्यास मदत मिळणार आहे.
आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच याठिकाणी सेवा देणार्या कर्मचार्यांसाठी निवासाची सोय होण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. उपकेंद्र स्तरावर रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. एकशिक्षक असणार्या शाळांमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. सार्वजनिक दळणवळणाची सुविधा परिणामकारक होण्यासाठी सेमाडोह येथून बसची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येरेकर यांनी दिल्या.