अकोला : मानवाने त्याच्या मृत्युनंतर केलेले अवयवदान कोणासाठी तर आयुष्य देणारे ठरते. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेउन ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हे ब्रीद सार्थ अंगीकारावे, असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवयांनी सोमवारी अकोला येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियानात ते बोलत होते.
पुढे बोलताने केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, अकोला जिल्ह्यात 16 हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हा अवयदानाचा संकल्प एक विक्रम असून अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल. ही चळवळ जनमानसात रूजविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अवयवदान महाअभियान सोहळ्याच्या प्रारंभी आरोग्य दिंडी काढण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. समारंभात उपस्थितांकडून अवयवदानाची शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शा. वै. महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षीगजभिये, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे,जि. स्त्री.रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. जयंतपाटील. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे, तुकाराम महाराज सखाराम पुरकरआदी उपस्थित होते.