

Care must be taken to ensure that no child marriages take place in the village on Akshay Tritiya
अकोला : पुढारी वृत्तसेवा
अक्षयतृतीया दि.19 एप्रिल रोजी असुन या दिवशी अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
अक्षयतृतीयेचा मुहुर्त हा शुभमुहुर्त असुन त्यावेळी सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजीत केले जातात. विवाहाकरीता शासनाने मुलांचे वय २१ वर्ष व मुलींचे वय १८ वर्ष निश्चीत करण्यात आले आहे यापेक्षा कमी वयाचे मुलामुलींचा विवाह झाल्यास तो विवाह बालविवाह ठरतो व असे विवाह बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ नुसार बेकायदेशीर ठरतात. अशा कृतीविरोधात गुन्हा नोंदविला जातो.
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी असुन शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंधअधिकारी आहेत. गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठीतअसुन सरपंच हे त्या समितींचे अध्यक्ष आहेत. पोलीस पाटील हे सदस्य आहेत पोलीस पाटील हे गाव व पोलीस ठाणे यांना जोडणारा मुख्य दुवा आहे.
सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना आवाहन करण्यात येते की, गावात जर कोणाचा विवाह ठरल्यास त्यांच्या वयाची खात्री करावी व अक्षय तृतीयेला गावात होणारे विवाह सोहळयांमध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक व पोलीस विभाग यांनी घेणे आवश्यक आहे. बालविवाह झाल्यास विवाह सोहळयामध्ये सहभागी होणारे, वाजंत्री, मंगल कार्यालये, बिछायत केंद्र, विवाह विधी पार पाडणारे मुलामुलींचे आई वडील या सर्वांवर गुन्हे दाखल होवु शकतात.
बालविवाह झाल्यास दोन लाख रूपये दंड व २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षेचे प्रावधान या कायद्यात आहे तरी बालविवाह होणार नाही याबाबत सर्वानी दक्ष राहून अकोला जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. गावात बालविवाह ठरला असेल तर त्या बाबत चाईल्ड हेल्प लाईन 1098 आणि पोलिस विभागा चे 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला यांनी केले आहे.