नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी नागपूरजवळील कळमना रेल्वे स्थानकाजवळ आज (दि.१२) रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास रुळावरून घसरली. यामुळे नागपूर ते हावडा रेल्वे मार्गावर अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. प्रवाशांना काहीकाळ गैरसोयींचा सामना करावा लागला. मात्र, लवकरच मार्ग सुरू करून प्रवासी गाड्या सोडण्यात आल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) नागपूर विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळपासूनच अनेक प्रवासी रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या. मात्र, त्यासाठी मालगाडीचे डिरेलमेंट कारणीभूत नसून उत्तर भारताकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या धुक्यामुळे उशिराने धावत असल्याचे मध्य रेल्वेच्या (CR) नागपूर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
रेल्वेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घेवून कोराडी वीज प्रकल्पाकडे निघालेल्या मालगाडीचे दोन व्हॅगन (वाघिनी) रुळाखाली घसरल्या. दोन्ही वॅगन तातडीने वेगळे करण्यात आले. दरम्यान, ही मालगाडी घसरल्याने कोणत्याही प्रवासी रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला नाही. केवळ कोराडी वीज प्रकल्पाकडे जाणारा रेल्वे मार्ग खराब झाला, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर भारताकडून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या १० ते १५ तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची कडक थंडीत गैरसोय झाली आहे.
हेही वाचा :