नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचा विजय; काँग्रेसची ऐनवेळी उमेदवार बदलण्याची रणनिती ठरली अपयशी | पुढारी

नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचा विजय; काँग्रेसची ऐनवेळी उमेदवार बदलण्याची रणनिती ठरली अपयशी

नागपूर : संजय पाखोडे

स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या नागपूर प्राधिकार मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा त्यांनी १७६ मतांनी पराभव केला. भाजपला ३१८ मतांची अपेक्षा असताना तब्बल ४४ मते बावनकुळे यांना अधिक मिळाली. भारतीय जनता पक्षाचा विजय हा सुनिश्चित होताच. कारण एकूण ५६० मतदारांपैकी ३१८ मतदार हे भाजपचे आहेत.

भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३६२ मते घेत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा १७६ मतांनी पराभव केला. मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली तर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाकडे ५६० पैकी ३१८ मते होती. मात्र मला तब्ब्ल ४४ मते अधिक मिळाली. त्यामुळे भाजप निश्चित होता.

मात्र भाजपचे निष्ठावान असलेले अन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे स्वयंसेवक असलेले नगरसेवक छोटू उर्फ रविद्र् भोयर यांनी ऐनवेळी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भोयर यांच्या या अनपेक्षित कृतींमुळे भाजपला धक्का बसला. भोयर यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपची मते फोडण्यात प्रयत्न केला खरा… पण काँग्रेसला त्यात यश आले नाही.

याउलट आज लागलेल्या निवडणूक निकालात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही पक्षातील नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांची मते फुटल्याचे दिसून आले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर छोटू भोयर हे भाजपचे मते फोडतील हा काँग्रेसचा अंदाज सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने त्यांचा उमेदवार बदलला.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले छोटू भोयर ऐवजी काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला आणि मंगेश देशमुख यांच्या समर्थनार्थ जाहीर पत्र प्रसिद्ध केले. मात्र दोन्ही वेळेस काँग्रेसचे अंदाजच चुकले. ना छोटू भोयर यांना निवडणुकीचे व्यवस्थापन निट जमले, ना अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना विजयी करण्यात काँग्रेस यशस्वी झाली. तसं बघितलं तर नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच कारणीभूत आहेत.

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मतदान केल्यामुळेच काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार उमेदवार बदलला. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार बदलण्याची नामुष्की नाना पटोलेंमुळे काँग्रेसवर ओढवली. आणि मंगेश देशमुख या अपक्ष असलेल्या काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलवून काय मिळवलं हे गुलदस्त्यातच आहे. किंवा उमेदवार बदलण्याची काँग्रेसला गरज का पडली? याचेही समर्पक उत्तर काँग्रेसकडे नाही.

हेही वाचा

Back to top button