काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर ह्या दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी जिल्ह्यातील मेळघाट दौऱ्यावर आहेत. अनेक गावात यशोमती ठाकूर यांनी पाणी टंचाई समस्या व रोजगार हमी योजनेचा आढावा घेत लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकल्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ताधाऱ्यांना लोकांची काळजी नाही,सरकार व अधिकारी हलगर्जीपणा करत आहे. सरकार वेड्या सारखं काम मेळघाट सोबत करीत आहे. त्यामुळे या गोष्टीचा निषेध करते, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. पालकमंत्री बेजबाबदारीने वागत आहे. मेळघाट मध्ये काही ठिकाणी कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केली जाते आहे,असा आरोपही आमदार ठाकूर यांनी केला. त्यांनी मेळघाट मधील लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं.