नागपूर: अंडा बिर्याणीतून गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० प्रवाशांना विषबाधा   | पुढारी

नागपूर: अंडा बिर्याणीतून गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० प्रवाशांना विषबाधा  

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अंडा बिर्याणी सेवन केल्यामुळे अनेकांना विषबाधा झाली, यातील 90 प्रवाशांना विविध शहरात रुग्णालयात दाखल करावे लागले. यशवंतपुर-गोरखपुर एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. दक्षिणेकडून उत्तरेकडे धावणाऱ्या रेल्वे गाडीत नागपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकावरील जनआहार स्टॉलवरून हा अन्नपुरवठा करण्यात आल्यामुळे नागपूर आणि बल्लारशाह येथील दोन्ही स्टॉल खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आले आहेत.

यशवंतपूर येथून निघालेली ही गाडी गोरखपूरकडे जात असताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशाह स्थानकावर या गाडीत अंडा बिर्याणीचे 200 तर नागपूर स्थानकावरूनही काही पार्सल रवाना करण्यात आले. मात्र तीन-चार तासांनी ही गाडी इटारसी, भोपाळ परिसरात असताना प्रवाशांनी पोटदुखी, मळमळ,उलटी असा त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. हा प्रकार एकाच वेळी वेगवेगळ्या कोचमध्ये घडत असल्याने फारसे गांभीर्याने कोणी घेतले नाही.

मात्र, एकाच वेळी अनेक कोचमध्ये हा प्रकार लक्षात आल्याने रेल्वे नियंत्रण कक्ष सतर्क झाला. कानपूरला गाडी असताना डॉक्टरांचे पथक गाडीत आले व त्यांनी उपचार सुरू केले. गंभीर प्रवाशांना इटारसी, कानपूर, झाशी येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. नागपूर रेल्वे विभागाला देखील या विषयाची माहिती देण्यात आली.

मध्य रेल्वे नागपूर विभागाचे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकाराची चौकशी सुरू असून नागपूर, बल्लारशा जन आहार मधील सर्व खाद्य पदार्थांची विक्री तातडीने थांबविण्यात आली आहे. नमुने तपासणीला पाठविले आहेत. अहवाल मंगळवार किंवा बुधवार पर्यंत अपेक्षित असून त्यानंतरच या खाद्यपदार्थातून विषबाधा झाली किंवा नाही, हे स्पष्ट होईल. मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल याप्रकरणी लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा 

Back to top button