‘उद्धव ठाकरे पिसाळलेत, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज’ : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

‘उद्धव ठाकरे पिसाळलेत, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज’ : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे पिसाळले आहेत. मोदीजींचा फोटो लावून मागच्या वेळेस यांचे १८ खासदार निवडून आले. आता मोदीजींचा फोटो गेला आणि मोदीजींचे नावही गेले. त्यांना आता भीती वाटते आहे. त्यांचे अठरा खासदार आता दोनवर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश अवस्थेत त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरे असे बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्ट्रातील चौदा कोटी नागरिकांचे जर गोपनीय मत घेतले तर महानालायकाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे दिसतील. ठाकरेंना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीला कुठलीतरी खोली असे फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा उल्लेख नालायक माणूस म्हणून केला होता. त्यावरूनच बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

बावनकुळे म्हणाले की, ‘ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचे साधू संतांचा हत्याकांड बघितले. ते मूग गिळून गप्प राहिले. ज्यांनी कोविडच्या काळात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. याच उद्धव ठाकरेंनी चौदा कोटी जनतेला वाऱ्यावर सोडले. अडीज वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला. अडीच वर्ष दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री आम्ही बघितला. (एकेरी उल्लेख करत) उद्धव ठाकरे काय देवेंद्र फडणवीस यांना नालायक वगैरे शब्द बोलत आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button