Kishore Tiwari On PM Modi : मोदींनी १० वर्षात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? किशोर तिवारी | पुढारी

Kishore Tiwari On PM Modi : मोदींनी १० वर्षात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? किशोर तिवारी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान मोदी यांनी २० मार्च २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी उत्पन्न दुप्पट करण्यासह दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ?, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते, शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसचा त्यांनी आज (दि. २८) पत्रकार परिषदेत निषेध केला. Kishore Tiwari On PM Modi

शेतकऱ्यांचे उत्त्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे, बँक शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन मुबलक पतपुरवठा करतील, लागवडीचा खर्च अर्धा करणार, सर्व शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा, वीज पुरवठा, कडधान्य पिकांसाठी विशेष प्रोत्साहन, डॉ. स्वामीनाथन यांच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणार, यासोबतच २०१४ ला दिलेली आश्वासने आता १० वर्षानंतर खोटी ठरली असल्याचे आणि भाजपा सरकार हवालदिल शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य माणसाची सतत फसवणूक करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. Kishore Tiwari On PM Modi

या संबंधात तिवारी यांनी एक पत्र नरेंद्र मोदींना पाठवले असून त्यात अनेक गंभीर विषयावर प्रकाश टाकला आहे. केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू, दोन कोटी रोजगार देवू, महागाई वर लगाम आणू, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करू, भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी प्रमुख आश्वासने भाजपाने दिली होती. १० वर्षात यातील एक ही शब्द मोदी सरकारने पाळला नसून एकीकडे शेतीवर खर्च दुप्पट झाला तरी आज सरकार हमी भाव सुद्धा द्यायला तयार नाही.

कापूस, सोयाबीनचे भाव पडले असतानाही केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी सी.सी.आय. आणि नाफेड माल खरेदी करण्यास तयार नाहीत. तुटपुंजे केंद्र उघडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. शिक्षण, आरोग्य यांच्यावरील खर्च तिप्पट झाला आहे. बेलगाम महागाईने आम आदमी हैराण आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव आकाशाला भिडले आहेत. दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. बेलगाम महागाई, बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्यांवर लक्ष देण्यास मोदी सरकारजवळ अजिबात वेळ नाही, असा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

हेही वाचा 

Back to top button