गडचिरोली: पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

गडचिरोली: पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: शेतात आलेल्या रानटी हत्तीना परतावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एका हत्तीने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मरेगावनजीक घडली. मनोज प्रभाकर येरमे (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून हा कळप गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली, दिभना, मौशीखांब, चांभार्डा, मरेगाव या परिसरात फिरत आहे. हे हत्ती धानाच्या गंजीचे नुकसान करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे हत्ती शेतात आल्याचे कळताच मनोज येरमे काही शेतकऱ्यांसह शेतावर गेले. हत्तींना परतावून लावत सायकलने परत येत असताना एका हत्तीने मनोजवर हल्ला केला आणि सोंडेने आपटून ठार केले. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

१६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. १७ ऑक्टोबरला गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील शेतकरी होमाजी गुरनुले यांना हत्तीने शेतात ठार मारले होते.
त्यानंतर सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या परिसरातील शेतकरी प्रचंड भयभीत झाले असून त्यांना शेतीची कामे करणे दुरापास्त झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button