गडचिरोली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून नक्षल्यांकडून तरुणाची हत्या | पुढारी

गडचिरोली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून नक्षल्यांकडून तरुणाची हत्या

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा:  पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील एका युवकाची गोळी झाडून हत्या केली. रामजी आत्राम (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. मागील दहा दिवसांत नक्षल्यांनी केलेली ही तिसरी हत्या असून या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

रामजी आत्राम हा कापेवंचा येथील आपल्या शेतात काम करीत होता. संध्याकाळी सशस्त्र नक्षलवादी शेतावर गेले आणि रामजीची गोळी झाडून हत्या केली. नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रक टाकले असून, त्यात रामजी पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी राजाराम खांदला पोलीस ठाण्यात अज्ञात नक्षल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ नोव्हेंबरला नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील टिटोडा येथे पोलिस पाटील लालसू वेळदा, तर १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथील दिनेश गावडे नामक युवकाची हत्या केली होती. दहा दिवसांत नक्षल्यांनी तीन जणांची हत्या केल्याने जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा 

Back to top button