अमरावती : गुन्हेगारांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार; पोलीस अधिक्षकाची कारवाई | पुढारी

अमरावती : गुन्हेगारांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार; पोलीस अधिक्षकाची कारवाई

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या 

वरूड तालुक्यातील पोलीस स्टेशन शेंदुरजना घाट ग्रामीण हद्दीतील टोळी प्रमुख आकाश अरुणराव वाघाळे (वय २८ वर्ष) आणि त्याचे साथीदार अमोल धनराज बोके (वय २८ वर्ष), पियुष ओमप्रकाश ढोके (वय २३ वर्ष), केशव प्रभाकर वंजारी (वय २५ वर्ष) सर्व रा. ग्राम मलकापूर, ता. वरुड अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या टोळीने शेंदुरजना घाट शहरातील व ग्राम मलकापूर भागातील शांतताप्रिय नागरीकांच्या जिवीताला व संपत्तीला गंभीर धोका निर्माण केला होता. सदर टोळीने लोकांना धमकविणे, घातक शस्त्रासह गैरकायद्याची लोक जमवून जातीय तणाव निर्माण करणे, लोकांवर हल्ला करणे, बलात्कार करणे असे गंभीर स्वरुपाचे कृत्य केले होते.

सदर टोळीवर दाखल असलेले अपराध व त्यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधक कार्यवाहीचा कोणताही परिणाम त्यांचे वर्तणुकीवर होत नव्हता. त्यांच्या अशा वागण्याने लोकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध कोणीही उघडपणे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास तयार होत नव्हते. ठाणेदार, पोलीस स्टेशन शेंदुरजना घाट यांनी नमुद टोळीला हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयास सादर केला होता. त्यानुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग मोर्शी यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त केला असता, त्यांनी सदर भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी टोळीस हद्दपार करण्याचे प्रस्तावित केले होते.

त्यानुसार पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी टोळी प्रमुख आकाश अरुणराव वाघाळे आणि टोळीतील सदस्य अमोल बोके, पियुष ढोके, केशव वंजारी यांना अमरावती व नागपूर जिल्ह्यामधून आणि सिमेलगतच्या मध्यप्रदेश राज्यामधील जिल्हा पांढुर्णा व बैतुलमधील अनुक्रमे पांढुर्णा व मुलताई तालुक्यांचे हद्दीतून एका वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे, ठाणेदार पो. स्टे. शेंदुरजना घाट सतिष इंगळे, पोउपनि सागर हटवार आणि अमोल देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पार पाडली.

Back to top button